भय आणि अद्भुतता यांचे मिश्रण असणाऱ्या कथा हे हृषीकेश गुप्ते यांचे वैशिष्ट्य ‘घनगर्द’ कथासंग्रहातील कथांमधून जाणवते. पहिल्या ‘घनगर्द’ या कथेतून पौगंडावस्थेतील गार्गीला आपण खोल दरीत पडत आहोत, बचावासाठी धावलेल्या बाबाचाही तोल जातो, अशी जाणवणारी भीती व वास्तवात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यातून होणारी तिची घालमेल दिसते.
लेखनासाठी बैठक मारलेली असताना बाहेर पावसात भिजून आलेली अनोळखी व्यक्ती व जाताना त्याने नायकाला दिलेली कथांची अनेक बीजे असलेली कुपी, लहानपणी केलेल्या आंब्यांची चोरी यामुळे निर्माण झालेली अपराधाची भावना व देवधर काकुंचे पात्र यातून नायकाचे भयाने भारलेले आयुष्य ‘पानगळ’मधून समोर येते. भूतकाळाच्या सावटात मनासारखे आयुष्य पेलताना द्यावा लागणाऱ्या मोबदल्याचे रूप ‘मुआवजा’मधून जाणून घेताना दाहक भय समोर येते. ‘रामवाटा’तील वास्तव व कल्पनांच्या मिश्रणातून उमटलेले भय वाचकांना खिळवून ठेवते.
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २३६
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)